अमरावती,
Ladki Bahin Yojana : राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणार्या १५०० रूपये आर्थिक सहाय्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या सभासदांना नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हास्तरावर पतसंस्थेची नोंदणी करण्याची ही राज्यातील पहिली घटना आहे.
राज्य शासनाची लाडकी बहीण योजना कार्यान्वित आहे. यात देण्यात येणार्या १५०० रूपयांच्या आर्थिक सहाय्यानंतरचे महिलांनी पुढचे पाऊल टाकले आहे. महिलांनी एकत्र येत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सभासदांची सहकारी पतसंस्था नोंदणी केली आहे. यात सुरवातीलाच ७ हजार ५०० सभासद सदस्य झाले आहेत. यात २१ लाख रूपयांचा निधी जमा झाला आहे. यातील सभासद संख्येत वाढ होणार आहे. सदर संस्था ही राज्यातील पहिली जिल्हास्तरीय संस्था म्हणून नोंदणीकृत झाली आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या प्रवर्तकांना संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहायक संचालक अनिरूद्ध राऊत उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यावेळी म्हणाले की, महिलांची पतसंस्था नोंदणी होणे ही ऐतिहासिक बाब आहे. लाडकी बहीण योजनेतून मिळणारे सहाय्य या बँकेच्या माध्यमातून गोळा होणार आहे. कर्ज स्वरूपात देण्यात येणार्या निधीचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिक नियोजन चोख असते. यामुळे पतसंस्थेची आर्थिक शिस्त वाढीस लागेल. त्यासोबतच गरजूंना पतसंस्थेचा लाभ होईल.
महिलांमधील उद्योजकता वाढीस लागावी म्हणून जिल्हा नियोजनमधून ६०० बचतगटांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ६ कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यात पहिली प्राथमिक सहकारी सेवा संस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. यातूनही महिलांमधील उद्योजकता वाढीस लागेल. तसेच आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधूनही कर्ज उपलब्ध होणार आहे. बचतगटांची ही चळवळ जिल्ह्यात खर्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करणारी ठरणार आहे.
यावेळी लाडकी बहीण पतसंस्थेच्या अध्यक्ष रजनी भोंडे, उपाध्यक्ष रेशमा सरदार, कोषाध्यक्ष विद्या धिकार, सचिव ज्योत्स्ना चांगोले, वैशाली चौधरी, सुनिता थोटे, मिना कडव, अनिता वैद्य, पद्मा सरदार, ज्योती बोरकर, भारती वानखडे, संमिता विरूळकर, विद्या काळे, रेखा कासदेकर, शाहीन बानो फिरोज खान, कौसल्या इखे, शीतल डेहनकर आदी उपस्थित होते.