मुंबई,
share market bear भारतीय शेअर बाजार सध्या गोंधळात आहे. दोन दिवसांच्या सलग विक्रीमुळे सेन्सेक्स १,२०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला असून, यामुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी, सेन्सेक्स ६०९ अंकांनी घसरून ८५,१०२.६९ वर बंद झाला. निफ्टीदेखील २१३.४५ अंकांनी घसरून २५,७४६.३० वर पोहोचला. मंगळवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४९०.२३ अंकांनी घसरून ८४,६१२.४६ वर उघडला, तर निफ्टी १५३.१५ अंकांनी घसरून २५,८०७.४० वर पोहोचला. दिवसअखेर बाजारातील घसरण अधिक तीव्र होत असून, बीएसई सेन्सेक्स ६५७.०४ अंकांनी घसरून ८४,४४३.७३ वर व्यवहार करत होता.
शुक्रवारी व्यवहार बंद होताना बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४,७०,९६,८२६ कोटी रुपये होते, तर मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा आकडा ४,५८,८८,८२० कोटी रुपयांवर घसरला होता. तज्ज्ञांच्या मते, भारतीय बाजारपेठेतील या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. त्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा, जागतिक बाजारपेठेतील घसरण, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवत स्थिती आणि निफ्टीच्या मुदत संपणे यांचा समावेश आहे. १० डिसेंबरला अमेरिकन फेडच्या निर्णयाची वाट पाहत असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. डिसेंबर महिन्यात परदेशी निधी त्यांच्या गुंतवणुकीवरून पैसे काढण्याच्या गतीत वाढ करत असल्याने भारतीय समभागांवर दबाव निर्माण झाला आहे.