पुणे,
Dr. Jayant Narlikar passes away ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (87) यांचे पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. डॉ. नारळीकर यांचे काल झोपेत (19 मे रात्री) निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. डॉ. नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते तर विज्ञान लेखकही होते. त्यांनी नाशिक येथे झालेल्या 94 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसी बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

१९६६ साली नारळीकर यांचा विवाह गणितज्ञ असलेल्या मंगला सदाशिव राजवाडे ह्यांच्याशी झाला होता. त्यांना तीन मुली होत्या. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद भूषविले होते. तर १९८८ साली त्यांची Dr. Jayant Narlikar passes away पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली होती. चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.