कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील : सहपालकमंत्री अ‍ॅड. जयस्वाल

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
गडचिरोली,
minister adv jaiswal गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे. हत्तींच्या हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅकुलाइज करून वळविण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत देहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी दिली. तसेच हा प्रश्‍न मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

jaiswal  
 
 
अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी 24 सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपवनसंरक्षक बी. वरूण प्रामुख्याने उपस्थित होते. सहपालकमंत्री जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिपरटोला-धुंडेशिवणी, दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली. ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 128 हेक्टर क्षेत्राची माहिती घेतली. यावेळी तत्काळ पंचनामे करून भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
चुरचुरा येथील 10 सप्टेंबर रोजीच्या हत्ती हल्ल्या मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांना एकूण 25 लाख रुपयांची मदत जाहीर असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. गावकर्‍यांशी संवाद साधताना नागरिकांनी हत्ती गावात येऊ नयेत अशी उपाययोजना करण्याची मागणी तसेच नुकसानीची मदत मिळण्यासाठी येणार्‍या अडचणी व विविध तक्रारी मांडल्या.minister adv jaiswal यावर सहपालकमंत्री अ‍ॅड जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने बाधितांना वेळीच मदत द्यावी, तसेच शासन लवकरच 50 हजार रुपये प्रति एकर मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन समस्या सोडविण्याची हमीही दिली. या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार उषा चौधरी तसेच राकेश बेलसरे, चंद्रशेखर भडांगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.