दुबई,
Haris Rauf and Sahibzada in trouble आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान संघ त्यांच्या खेळापेक्षा वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत आला आहे. भारताविरुद्ध २१ सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी केलेल्या कृतींवरून बीसीसीआयने थेट आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. या सामन्यात हरिस रौफने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना भारतीय चाहत्यांकडून "कोहली, कोहली" अशा घोषणा होत असताना विमान पाडण्याचा इशारा करून चिथावणीखोर वर्तन केले. फलंदाज साहिबजादा फरहानने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीचा इशारा करत जल्लोष केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने स्पष्टपणे सांगितले की लोक कसे घेतील याची त्याला पर्वा नाही. हे दृश्य जागतिक क्रिकेट विश्वाने पाहिले आणि पाकिस्तानच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

या लज्जास्पद प्रकारावर बीसीसीआयने कठोर भूमिका घेत दोन्ही खेळाडूंबाबत आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आता रौफ आणि फरहान यांना आपल्या कृतीबाबत आयसीसीसमोर खुलासा करावा लागणार आहे. आरोप फेटाळायचे असल्यास त्यांना लेखी उत्तर द्यावे लागेल, अन्यथा रेफरी रिची रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणीसाठी सामोरे जावे लागेल. दोषी ठरल्यास दोघांवर बंदीची कारवाई होऊ शकते. Haris Rauf and Sahibzada in trouble दरम्यान, बीसीसीआयच्या या तक्रारीला प्रत्युत्तर देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्धही तक्रार दाखल केली आहे. मात्र ही तक्रार सामन्यानंतर सात दिवसांच्या आतच दाखल करता येते, त्यामुळे आयसीसी ती नाकारण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्या लज्जास्पद वर्तनाचे परिणाम आता त्यांना भोगावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.