मुंबई,
dhanashree verma डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाणारी धनश्री वर्मा सध्या चर्चेतील रिअॅलिटी शो ‘राइज अॅण्ड फॉल’मध्ये सहभागी आहे. हा शो अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत असून प्रेक्षकांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय ठरतो आहे. या शोमध्ये सहभागी असताना धनश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, विशेषतः तिच्या घटस्फोटावर अनेक वेळा भाष्य केले आहे. अलीकडेच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये तिने एलिमनी (घटस्फोटानंतर मिळणारा भरणपोषणाचा खर्च) संदर्भात मोठे वक्तव्य केले असून तिच्या या वक्तव्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांचा विवाह आणि त्यानंतर आलेला त्यांचा घटस्फोट बराच काळ चर्चेत होता. मात्र, ‘राइज अॅण्ड फॉल’मध्ये सहभागी झाल्यापासून धनश्रीने अनेकदा आपल्या वैवाहिक आयुष्याविषयी उघडपणे बोलले आहे, तरीही तिने एकदाही चहलचे नाव घेतलेले नाही. नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये ती एलिमनीच्या मुद्द्यावर स्पष्ट बोलताना दिसली. तिने स्पष्ट केले की तिचा घटस्फोट हा पूर्णपणे आपसी सहमतीने झाला होता आणि एलिमनीबाबत पसरवली जाणारी माहिती चुकीची आहे.
या व्हायरल क्लिपमध्ये शोमधील सहकारी आदित्य नारायण धनश्रीशी संवाद साधताना विचारतात की तिचा अधिकृत घटस्फोटाला किती काळ झाला आहे. यावर उत्तर देताना धनश्री म्हणते, "एक वर्ष." त्यावर एक इतर स्पर्धक म्हणतो की हे सर्व खूप लवकर झाले, त्यावर धनश्री उत्तर देते की, “हो, कारण आपसी सहमती होती. त्यामुळेच लवकर पार पडले.”
पुढे बोलताना धनश्रीने समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “लोक एलिमनीबाबत बोलतात, ते चुकीचे आहे. मी जर काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की लोक काहीही बोलतील. माझ्या पालकांनी मला शिकवले आहे की तुम्ही फक्त त्यांनाच स्पष्टीकरण द्या ज्यांची तुम्ही काळजी करता.”‘राइज अॅण्ड फॉल’ या शोमध्ये धनश्रीसोबतच अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले असून, शोमध्ये त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील संघर्ष आणि भावनिक प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला जात आहे. शो ६ सप्टेंबरपासून स्ट्रीम होत असून, त्यातील अनेक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.धनश्री वर्माच्या या वक्तव्यानंतर तिच्या आणि चहलच्या नात्याविषयी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मात्र, धनश्रीने अत्यंत संयमाने आणि स्पष्टतेने आपली भूमिका मांडत अफवांना पूर्णविराम दिला आहे.