नागपूर,
dr-prashant narnavare नागरी सभ्यतेच्या विकासात राज्यशास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून समाज, शासन व लोकशाही प्रक्रियेचे आकलन राज्यशास्त्रातूनच घडते, असे प्रतिपादन राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. रातुम नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या (स्वायत्त) ८० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. ए. के. डोरले सभागृह येथे सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे, तर सन्माननीय अतिथी म्हणून रायसोनी विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल आणि विभागप्रमुख डॉ. विकास जांभुळकर उपस्थित होते.
डॉ. नारनवरे यांनी नागपूर विद्यापीठाच्या ऐतिहासिक भूमिकेचा उल्लेख करत, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात असहकार आंदोलनामुळे इतर विद्यापीठांतून निलंबित विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने आश्रय व शिक्षण दिल्याचा गौरवशाली इतिहास सांगितला. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विज्ञान व मानव्यशास्त्र यांचा संवाद घडवणारे, मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक असल्याचे मत मांडले.dr-prashant narnavare अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी राज्यशास्त्र विभाग भविष्यात राजकीय अभ्यासाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते राज्यशास्त्र विभागाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.