नागपूर,
National Service Scheme Camp ग्रंथ व पुस्तके वाचणे महत्त्वाचे असले तरी समाज वाचणे हीच जीवनाची खरी पाठशाळा आहे. समाजातूनच मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास होतो. समाजात अशी माणसे भेटतात जी जीवन जगण्याची नवी दिशा देतात आणि आदर्श जीवनाची प्रेरणा देतात. म्हणून समाज वाचणे हेच खरे शिक्षण आहे, असे परखड मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारसाहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, केवळ नोकरी मिळवण्यासाठी घेतलेली पदवी म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण व्यक्तिमत्त्व विकास करणारे, स्वावलंबी जीवनाकडे नेणारे असावे. यासाठी विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावतात.

श्रीगुरुदेव मानव मंदिर, रक्षक बाग, येरला येथे जी.एस. कॉलेज यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. National Service Scheme Camp यावेळी त्यांनी या निसर्गरम्य परिसराच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर चिंतन मांडले. विद्यार्थ्यांच्या शंका-समाधानासह प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र