मालेगाव,
Usha Jadhav मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागाकडून ताडपत्री व सोयाबीन चाळणी यंत्र करिता ७५ टक्के अनुदानावर अर्ज मागण्यात आले होते. तालुयातील अनेक शेतकर्यांनी अर्ज दाखल करुन पात्र लाभार्थ्यांनी ताडपत्री तसेच चाळणी यंत्र विकत घेतल्या. परंतु या लाभार्थ्यांना जे शासनाकडून ७५ टक्के अनुदान मिळणार होते ते त्यांच्या खात्यात अद्यापही जमा झाले नसल्याने पात्र लाभार्थी अनुदानासाठी चकरा मारत आहेत. या वंचित असलेल्या पात्र शेतकर्यांना त्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान जमा करावी, अशी मागणी माजी जि.प. सदस्य उषा जाधव यांनी केली आहे.
जिल्हा परिषद उपकर योजना सन २०२५ -२६ अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर धान्य संरक्षक सक ताडपत्री संच व सोयाबीन चाळणी संच, यंत्र खरेदी करण्याकरिता पूर्व संमती साठी अर्ज मागविण्यात आले होते. याकरिता २१ नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख होती. तेव्हा तालुयातील अनेक अनेक अल्पभूधारक शेतकर्यांनी अर्ज केले होते. यामध्ये जवळपास ३३ शेतकर्यांना ताडपत्री मंजूर झाली होती तर २१ शेतकर्यांना सोयाबीन चाळणी यंत्र मंजूर झाले होते. या पात्र सर्व शेतकर्यांनी जवळचे दहा ते अकरा हजार रुपये प्रत्येकी भरून, ताडपत्री व चाळणी विकत घेतली होती. जवळपास दोन महिने कालावधी झाला असता अद्यापही या शेतकर्यांच्या खात्यात जिल्हा परिषद मधून ७५ टक्के रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, या वंचित असलेल्या शेतकर्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात यावे, अशी मागणी उषा जाधव यांनी केली आहे.