नवी दिल्ली,
Harbhajan Singh's statement भारत आणि बांगलादेशच्या क्रिकेट संबंधांत सध्या तणावाचे वातावरण आहे. आयपीएल २०२६ मधून बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळण्यात आलेल्या निर्णयाने या तणावाला नवे वळण मिळाले. कोलकाता नाईट रायडर्स संघाने ९.२ कोटी रुपयांना रहमानला खरेदी केले होते, परंतु बीसीसीआयने सुरक्षा आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन संघाला त्याला सोडण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) नाराजी व्यक्त केली आणि पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० सामने भारताबाहेर हलविण्याची विनंती आयसीसीकडे केली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी विश्वचषक विजेता फिरकी गोलंदाज हरभजन सिंग म्हणाले की, बांगलादेशमध्ये जे घडले ते चुकीचे होते. आम्ही भारतातील सर्वांचे स्वागत करतो. परंतु जर बांगलादेश येऊ इच्छित नसेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. आयसीसीने त्यांच्या विनंतीवर निर्णय घ्यावा. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे बांगलादेश येथे येऊ इच्छित नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार बांगलादेश संघाचे तीन सामने कोलकाता आणि एक सामना मुंबई येथे होणार आहेत. तथापि, बीसीबीच्या विनंतीनंतर बीसीसीआय नवीन वेळापत्रकावर काम करत असल्याचे समजते. या परिस्थितीत, भारत आणि बांगलादेशच्या संघांसाठी अंतिम निर्णय आयसीसीकडे राहील.