नवी दिल्ली,
Cold wave wreaks havoc in North India देशभरात थंडीचा जोर वाढत चालला असून उत्तर भारतात शीतलहरीने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान खात्याने उत्तर भारतातील १५ जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा इशारा जारी केला असून दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत असून सकाळ आणि रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे. या पर्वतीय भागातील हवामानातील बदलांचा परिणाम मैदानी प्रदेशांवरही जाणवत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये दाट धुक्याची शक्यता असून वाहनचालकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत थंड दिवस आणि शीतलहरीची तीव्रता वाढू शकते, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागातील तापमान झपाट्याने घसरले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असून अनेक ठिकाणी रस्ते आणि मोकळी मैदाने ओळखणे कठीण झाले आहे. रस्ते मोकळे ठेवण्यासाठी बर्फ काढण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. दऱ्या, डोंगर आणि झाडे पूर्णपणे बर्फाने झाकली गेल्याने परिसर अक्षरशः पांढऱ्या चादरीत लपेटल्यासारखा दिसत आहे.
हिमाचल प्रदेशातही कडाक्याची थंडी असून चंबा, मनाली, भदरवाह आणि गुलमर्गसारख्या पर्यटनस्थळांवर जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. रस्ते, झाडांच्या फांद्या आणि इमारती गोठल्या असून सर्वत्र बर्फाचे साम्राज्य पसरले आहे. या थंडीच्या वातावरणातही पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. उत्तराखंडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. केदारनाथ धाममध्ये या हिवाळ्यात दुसऱ्यांदा बर्फवृष्टी झाली असून मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग जाड बर्फाच्या थराखाली गेला आहे. डेहराडूनसह अनेक भागांत थंडीच्या लाटांसह धुक्याचा प्रभाव कायम आहे. हवामान खात्याने डोंगराळ राज्यांमध्ये पुढील काही दिवस बर्फवृष्टी सुरूच राहण्याचा अंदाज वर्तवला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.