वाशीम,
Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan केवळ तपासणीपुरते किंवा पुरस्कार मिळवायचा म्हणून गाव चांगले करू नका तर कायमस्वरूपी आपले गाव स्वच्छ, सुंदर, हरित आणि आदर्श ठेवा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण यांनी रिसोड तालुयातील मोरगव्हाण येथे केले.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत ५ जानेवारी रोजी मोरगव्हाण या ग्रामपंचायतला त्यांनी भेट दिली आणि विविध विकास कामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन खुळे, गट शिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, विस्तार अधिकारी उमाळे, शाखा अभियंता इंगोले आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सीईओ चौहान म्हणाले की यापूर्वी जिल्ह्यातील खूप गावे स्वच्छता अभियानामध्ये आणि स्मार्ट ग्राम योजनेमध्ये आघाडीवर होते. परंतु त्यानंतर ते याच कामात मागे पडले. त्यांच्या गावातील स्वच्छता किंवा इतर नाविन्यपूर्ण उपक्रम हे शाश्वत राहिले नाहीत. मोरगव्हाण मध्ये असे होऊ नये, गाव कायमस्वरूपी आदर्श ठेवा असे ते म्हणाले. भेटी दरम्यान सीईओ यांनी गावातील शाळा, अंगणवाडी, परसबाग, फळबाग, कचरा व्यवस्थापनासाठी बांधण्यात आलेले शेग्रीगेशन शेड इत्यादी कामांची पाहणी केली.
भेटीदरम्यान गावात पुरेशी स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली होती. गावातील लोकसहभाग पाहून सीईओ अर्पित चौहान यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, माजी पोलिस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, जि. प. शाळा मुख्यध्यापक, प्राध्यापक चोपडे आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची उपस्थिती होती.