नवी दिल्ली,
Jammu and Kashmir in Ranji Trophy final भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला गेला असून जम्मू आणि काश्मीर संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात बलाढ्य पश्चिम बंगाल संघाचा पराभव करत त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली. चौथ्या डावात १२६ धावांचे लक्ष्य समोर असताना जम्मू आणि काश्मीरच्या फलंदाजांनी संयम राखत सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयामागे सर्वात मोठा वाटा गोलंदाज आकिब नबी यांचा ठरला. त्यांनी सामन्यात एकूण नऊ बळी घेतले, ज्यात पहिल्या डावातील पाच बळींचा समावेश होता. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना सामनावीराचा सन्मान मिळाला. फलंदाजीत अब्दुल समद यांनीही मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावातील ८२ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीनंतर दुसऱ्या डावात त्यांनी नाबाद ३० धावा करून संघाला विजयरेषा पार करून दिली.
बंगालच्या पहिल्या डावात सुदीप कुमार घरमी यांनी १४६ धावांची भक्कम खेळी साकारली आणि संघाला स्पर्धात्मक धावसंख्या गाठून दिली. त्यानंतर मोहम्मद शमी यांनी आठ बळी घेत जम्मू आणि काश्मीरला दबावाखाली ठेवले. तरीही जम्मू आणि काश्मीरने प्रतिआक्रमण करत आघाडी कमी ठेवली. दुसऱ्या डावात त्यांच्या गोलंदाजांनी कमाल दाखवली. नबी आणि सुनील कुमार यांनी प्रत्येकी चार बळी घेत बंगालचा डाव अवघ्या ९९ धावांत गुंडाळला. उपांत्यपूर्व फेरीतही नबी यांनी मध्य प्रदेशविरुद्ध निर्णायक गोलंदाजी करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघाला अंतिम फेरी गाठणे शक्य झाले. आता जम्मू आणि काश्मीरचे लक्ष्य विजेतेपदाकडे आहे. अंतिम सामन्यात त्यांचा सामना कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. इतिहास रचणाऱ्या या संघाकडे आता आणखी एक सुवर्णपान लिहिण्याची संधी आहे.