नवी दिल्ली,
Modi's letter to Tariq Rahman पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांना लिहिलेल्या पत्रातून भारत आणि बांगलादेशच्या मैत्रीपूर्ण संबंधांना नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. २० वर्षांनंतर सत्ता मिळवलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान हे गेल्या ३६ वर्षांमध्ये बांगलादेशचे पहिले पुरुष पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामार्फत तारिक रहमान यांना पत्र पाठवले आहे.
पत्रात पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांचे बांगलादेशातील संसदीय निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी सांगितले की, हा विजय बांगलादेशच्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे आणि देशाला शांतता, स्थिरता आणि समृद्धीकडे नेण्याच्या त्यांच्यादृष्टिकोनाचे प्रतीक आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असून, दोन्ही देशांचा इतिहास, सांस्कृतिक नाते आणि शांतता, समृद्धीसाठीच्या लोकांच्या आकांक्षा या मैत्रीच्या खोल पाया आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी पत्रात पुढे म्हटले की, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत आणि बांगलादेश प्रादेशिक सहकार्य, कनेक्टिव्हिटी, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य विकास, ऊर्जा, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक तसेच लोक-ते-लोक संपर्क अशा विविध क्षेत्रात एकत्र काम करू शकतात. त्यांनी सांगितले की, दोन वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आणि महत्त्वाकांक्षी समाज म्हणून भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या शाश्वत विकासासाठी, सुरक्षिततेसाठी आणि परस्पर समृद्धीसाठी उत्प्रेरक ठरू शकतात. शेवटी, पंतप्रधान मोदी यांनी तारिक रहमान, त्यांच्या पत्नी डॉ. झुबैदा रहमान आणि मुलगी झैमा यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले असून, त्यांच्या भारत भेटीचे हार्दिक स्वागत केले जाईल असे स्पष्ट केले. त्यांनी बांगलादेशच्या जनतेसाठी पंतप्रधान रहमान यांना चांगले आरोग्य, यश आणि सतत प्रगती आणि समृद्धीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.