दोन आरोपी जेरबंद
तिवसा,
Murder तिवसा तालुक्यातील भारवाडी—वर्धा पुलाजवळ असलेल्या आयआरबी कंपनीच्या ट्रक ले-बाय परिसरात झालेल्या खळबळजनक हत्येप्रकरणी तिवसा पोलिसांनी दोन दिवसांत गुन्ह्याचा उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. विमल सतीश अग्रावत (वय ३८ वर्षे, रा. गांधीग्राम, राजकोट, गुजरात) हे नागपूर येथून तिवसा तालुक्यातील भारवाडी—वर्धा पुलाजवळील आयआरबी कंपनीच्या ट्रक ले-बाय येथे पहाटे ४ वाजताच्या दरम्यान थांबले होते. त्यावेळी आरोपींसोबत झालेल्या वादातून चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
Murder घटनेनंतर तिवसा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हातात घेतली. तपासादरम्यान राजकोट (गुजरात) येथील दोन संशयित आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानुसार माहिर माजिदभाई सोलंकी (वय २२, रा. हुसैनी चौक, राजकोट) व राज बहिदभाई चव्हाण (वय २२, रा. नानावटी चौक, राजकोट) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील बुलेनो वाहन क्रमांक जीजे ०३ पीडी ०९११ जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येत असून, त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
कट रचून हत्या
Murder डिसेंबर २०२५ मध्ये मृतक विमल यांच्या अल्पवयीन बहिणीला सुजल या तरुणाने पळवून नेल्याच्या घटनेत राज चव्हाण व माहीर सोलंकी यांनी मदत केल्याचा आरोप होता. त्यानंतर विमल समजुतीच्या नावाखाली पैशांची मागणी करीत होता व धमक्या देत होता, असे समोर आले आहे. पैशांवरून वाद वाढत जाऊन चारचाकी वाहन जाळल्याचीही माहिती आहे. भीतीपोटी कट रचून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.