७५ हजार हिंदूंची हत्या लपवून ठेवण्यात आली – मुख्यमंत्री फडणवीस

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
मुंबई,
75 thousand Hindus killed – Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आपले मत स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, इतिहासाची अनेक वर्षे खोटी मांडणी केली गेली आहे. वर्षानुवर्षे आपल्याला हे शिकवले गेले की टिपू सुलतान हे महान राजे होते. परंतु, त्याने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची हत्या केली, हे कधी शिकवण्यात आले नाही. इंग्रजांशी लढण्यामागील त्याचे खरे कारणही सांगितले गेले नाही, असे फडणवीस म्हणाले.
 
 
Fadnavis
 
मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केले की, टिपू सुलतान आपले राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांशी लढला. मात्र इतिहास शिक्षकांनी हे तथ्य लोकांसमोर आणले नाही. आता खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांनी एनसीआरटीच्या पुस्तकांवरही भाष्य केले. वर्षानुवर्षे मोघली साम्राज्याला १७ पानं दिली गेली, तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फक्त एक परिच्छेद होता. मोदी सरकारच्या काळात मराठ्यांच्या इतिहासाला २० पानं दिली गेली आहेत. योग्य इतिहास शिकवला असता, देशात कोणीही औरंगजेबासारख्या आक्रमकांना हिरो मानले नसते, असे फडणवीस म्हणाले.
 
 
 
 
 
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांना कुठलाही आक्षेप नाही. परंतु जे लोक देशविरोधकांना हिरो मानतात, त्यांना त्यांनी सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, विरोधक भ्रमित आणि संभ्रमित दिसत आहेत. त्यांनी सुचवले की, संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे विचार करून मुद्दे मांडावे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या हितात त्यांचे योगदान वाढेल.
 
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही देशातील पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सच्या मार्गावर आहे आणि ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला गेला आहे. महाराष्ट्राने दरवर्षी ३ लाख ६० हजार कोटींचा जीएसटी जमा केला, कृषी निर्यात आणि सेवा क्षेत्रातही राज्याचा मोठा वाटा आहे. तसेच, जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाणही उत्तम ठेवले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.