मुंबई,
Maharashtra Marathi Bhasha Din controversy राज्यात २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कांदिवली परिसरात एका महाविद्यालयाच्या नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. कांदिवली पश्चिम येथील बालभारती मगनलाल जे. पांचोलिया महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठीऐवजी केवळ गुजराती भाषेत नाव लिहिण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे स्थानिक मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेल्या फलकावर मराठी (देवनागरी) भाषेतील नाव नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रातील विद्यमान नियमांनुसार सर्व दुकाने, आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांच्या नामफलकांवर मराठी भाषेतील नाव मोठ्या किंवा किमान समान आकारात असणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित महाविद्यालयाने या नियमांचे पालन न केल्याची टीका होत आहे.
या मुद्द्यावरून यापूर्वीही Maharashtra Marathi Bhasha Din controversy आंदोलन झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर प्रशासनाने मूळ गुजराती फलकावर मराठी नावाचा स्टिकर लावल्याचे सांगितले होते. मात्र काही दिवसांत तो स्टिकर निघून गेल्याने पुन्हा केवळ गुजराती नाव झळकू लागले. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दरम्यान, या प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख संतोष राणे यांनी महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन देत मराठी नामफलक तातडीने लावण्याची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगार व सेवा अटी) अधिनियम, २०१७’ नुसार मराठी नामफलक बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच मराठी भाषा गौरव दिनापूर्वी कायमस्वरूपी आणि ठळक मराठी फलक न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.स्थानिक नागरिक आणि पालकांनीही या प्रकरणात भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. संबंधित महाविद्यालय प्रशासन याबाबत काय निर्णय घेते आणि मुंबई विद्यापीठ तसेच राज्य शासन कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.