नवी दिल्ली,
t20-world-cup-2026 टी-२० विश्वचषकात आजचा दिवस भारतीय संघासाठी निर्णायक ठरणार आहे. चेन्नईत भारत झिम्बाब्वेविरुद्ध सायंकाळी मैदानात उतरणार असला, तरी त्याआधी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुपारी ३ वाजता होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लढतीचा निकाल भारताच्या उपांत्य फेरीच्या आशांवर थेट परिणाम करणारा ठरू शकतो.

दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर भारताची स्थिती कठीण झाली आहे. त्यामुळे गटातील समीकरणे आता अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. भारतासाठी आदर्श परिस्थिती अशी असेल की दक्षिण आफ्रिकेने आपले उर्वरित सामने जिंकावेत आणि भारताने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवावा. अशा वेळी दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण होतील, भारत चार गुणांवर राहील, तर इतर दोन्ही संघ प्रत्येकी दोन गुणांवर थांबतील. मात्र हे समीकरण बिघडल्यास धावगतीचा मुद्दा पुढे येऊ शकतो, आणि सध्या भारताचा नेट रन रेट इतरांपेक्षा कमी असल्याने धोका वाढू शकतो. t20-world-cup-2026 अहमदाबादमधील मैदान मोठे असल्यामुळे चौकार-षटकार सहज साधणे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला असल्याने त्यांना परिस्थितीची चांगली जाणीव आहे. दोन्ही संघ सध्या चांगल्या लयीत असले, तरी दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास अधिक दिसून येतो.
मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताकडून झालेल्या पराभवाची खंत दक्षिण आफ्रिकेच्या मनात अजून ताजी आहे. यावेळी ‘चोकर’ ही प्रतिमा पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. t20-world-cup-2026 त्यांच्या ताब्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब असला तरी इतर मोठी आयसीसी ट्रॉफी त्यांच्या नावावर नाही. दुसरीकडे वेस्ट इंडिजने दोन वेळा टी-२० विजेतेपद पटकावले आहे आणि हरवलेले वर्चस्व पुन्हा मिळवण्याची त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे सध्याच्या वेस्ट इंडिज संघातील काही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकन लीगमधील अनुभव असल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या शैलीची त्यांना चांगली ओळख आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. भारताचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर या लढतीच्या निकालावर अवलंबून असल्याने भारतीय चाहत्यांचे लक्ष आधी अहमदाबादकडे आणि नंतर चेन्नईतील आपल्या संघाच्या कामगिरीकडे असेल.