आष्टी तालुयातील जामगाव येथील गावापासून ते बसस्थानकापर्यंत सुमारे २५६ मिटरचा रस्ता बांधकाम डिपीडीसी २०२४-२५ अंतर्गत करण्यात येत आहे. मात्र, ही कामे अंदाजपत्रकाला डावलून तसेच निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप माजी उपसरपंच Ankit Kawale अंकित कावळे यांनी आज शुक्रवार २७ रोजी स्थानिक श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात अधिकार्यांकडे अनेकदा तक्रारी केल्यानंतरही या कामाची कोणतीही चौकशी अद्याप झाली नसल्याने अधिकारी आणि ठेकेदारामध्ये आर्थिक साटेलोटे असल्याची शंकाही त्यांनी यावेळी उपस्थित केली. डिपीडीसी अंतर्गत जामगाव येथे रस्ता बांधकामाचे कंत्राट सोसायटीच्या नावावर मंजूर करण्यात आले.
प्रत्यक्षात मात्र काम दुसराच ठेकेदार करीत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार शासकीय ठेकेदारी नियमांचा भंग करणारा असून सबकॉन्ट्रॅट दिला असल्यास त्याची पूर्वपरवानगी, लेखी आदेश व करारही दाखविण्यात आले नाही. सदर काम २५६ मीटरचे असून या कामात मटेरियल, रॉयल्टी, तांत्रिक मानके व प्रशासकीय प्रक्रियांचे उल्लंघन अशा अनेक अनियमितता आढळून आल्या. रस्त्यावर टाकलेला मुरूम निकृष्ट दर्जाचा असून त्याच मुरूमावर रोडरोलर फिरवून रस्ता सपाट करण्याचे काम सुरू होते. मात्र, या कामाबाबत विचारणा केली असता ठेकेदार अंगावर धावून आला. यासंबंधीची तक्रार जिपचे उपअभियंता दिवटे यांच्याकडे केली. त्यांनी बांधकाम स्थळावर येऊन पाहणी करून ठेकेदाराला अंदाजपत्रकानुसार काम करण्याच्या सूचना केल्या. मात्र, ठेकेदाराने त्यांच्या सुचनांचे पालन न करता आपल्याच मर्जीने काम सुरू ठेवले. ३० लाख रुपयांच्या या रस्ता बांधकामात चोरीच्या गौण खनिजाचाही वापर केला जात असल्याचा आरोप उपसरपंच Ankit Kawale अंकित कावळे यांनी यावेळी केला.
रस्ता बांधकाम करतेवेळी आधी ४० एमएमची गिट्टी वापरून त्यावर मुरूम टाकायचा होता. मात्र, अर्ध्याच रस्त्यावर गिट्टी आणि अर्ध्या रस्त्यावर थेट मुरूम टाकून टाकण्यात आला. या कामात व्हायब्रेटर रोलरही वापरण्यात आला नाही. त्यामुळे हा रस्ता तयार झाल्यास त्याचा दर्जा काय असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात अनेकदा अधिकार्यांना लेखी तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारींकडे सर्वांनीच कानाडोळा केला आहे. जिल्हाधिकारी आणि जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रारी देऊन लेखी उत्तर मागवले. मात्र, अजूनही या कार्यालयाकडून उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन कामाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.