तभा वृत्तसेवा
मुंबई,
Devendra Fadnavis जगात ज्या भाषा ज्ञानभाषा बनतात त्या पुढे प्रवाहित होतात. ज्या भाषेतून व्यवहार, शिक्षण आणि रोजगाराची संधी निर्माण होते, तीच भाषा समाजात प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे अभिजात मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध मराठी पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपसभापती नीलम गोèहे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठी अभिमानाची परंपरा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रशासनात मराठीचा वापर रूजवताना भाषेचे शुद्धीकरण करण्यासाठी शब्दकोश तयार केला. फारशी व अरबी भाषेच्या प्रभावातून मराठीला स्वाभिमानाने उभे करण्याचे कार्य त्यांनी केले. मराठी भाषेचा अभिमान याच परंपरेतून पुढे आला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे तिच्या संवर्धनाला नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मराठीला जोजगाराची आणि जागतिक व्यवहाराची भाषा बनवू- एकनाथ शिंदे
मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण, रोजगार आणि जागतिक व्यवहाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
माझ्या रक्तात मराठी, माझ्या श्वासात मराठी, असे भावनिक उद्गार काढत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनी माय मराठीचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
डिजिटल माध्यमांत मराठीचा वापर वाढवूया - सुनेत्रा पवार
तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याची गरज अधोरेखित केली. लंडनमध्ये प्रस्तावित महाराष्ट्र भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत त्यांनी मराठीच्या जागतिक प्रसारासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. सार्वजनिक ग्रंथालयांना वाढीव अनुदान देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
जावे विनोदाच्या गावा’ कार्यक्रमात साहित्य-कलांचा संगम
कार्यक्रमात विनोदी कविता, विडंबन गीत आणि मराठी अभिमान गीतांचे सादरीकरण झाले. कविवर्य सुरेश भट लिखित आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर करण्यात आले.
अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी पु. ल. देशपांडे यांच्या लेखाचे वाचन केले, तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जयवंत दळवी लिखित लेख तसेच मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचे वाचन केले. वि. दा. करंदीकर लिखित ‘साठीचा गजर’ ही कविता सादर करण्यात आली.