राजकमल रेल्वे उड्डाणपुलासाठी मिळणार निधी

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
आ. सुलभा खोडके यांची मागणी
अमरावती, 
गेल्या सहा महिन्यापासून अमरावतीमधील रेल्वे उड्डाणपूल सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात वाहतूक व रहदारीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सदर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी १२५.३७ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने अमरावती रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी १२५.३७ कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी अमरावतीच्या MLA Sulabha Khodke आमदार सुलभा खोडके यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अमरावती शहरातील राजकमल चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.
 
 
Khodke
 
अमरावती ते बडनेरा या रेल्वे लाईनवर सन १९६३ च्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. या उड्डाणपुलावरून शहराच्या चार भागाची वाहतूक जोडली गेली असून अमरावती शहरातील राजकमल चौक, हमालपुरा, रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौकासारख्या महत्त्वाच्या केंद्रांना हा रेल्वे पूल जोडला असल्याने शहरवासीयांना वाहतूक व रहदारीची चांगली सुविधा होत होती. दरम्यान स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आल्याने गेल्या २५ ऑगस्ट २०२५ पासून या पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सुद्धा MLA Sulabha Khodke  आ. सुलभा खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. सदर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती देण्यासाठी शासनाने बजेटमध्ये निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. सुलभा खोडके यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच येत्या ६ मार्च रोजी सादर होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये १२५.३७ कोटींची तरतूद करण्याची घोषणा करावी, अशी विनंती सुद्धा करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच या उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.