तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yugalsharan discourse, ईश्वर मानव कल्याणासाठी लीलावतार घेत असतात आणि आपली माहिती व गुणगान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिनिधी पाठवतात, असे वैष्णवाचार्य युगलशरण यांनी श्री बालाजी कथापर्वात चतुर्थ पुष्प गुंफताना सांगितले.
कथेचा प्रारंभ कमलकिशोर बागडी यांच्या शंखनाद व आरतीने झाला. आरती व व्यासपूजन रमेश बंग, उमरखेडचे लक्ष्मीनारायण भंडारी, घनश्याम बागडी, महेश बंग, राहुल झुनझुनवाला यांनी केले. त्यांनी तिरुपती येथील तीर्थाची महती सांगितली. तीर्थात स्नान व आचमनाची आवश्यकता प्रतिपादित केली. आज सर्व सरोवर, नद्यांचे जल प्रदूषित होत असल्याची चिंता व्यक्त केली. मानव हा भोगविलासात रममान, येथे सतत आवागमन सुरू आहे. म्हणून माया-मुक्त होण्यासाठी सत्संग आवश्यक आहे. संसार मायेत गढून असाल तर, जसे चिखलात असूनही सत्संगरूपी तेल लावल्यास आयुष्याचे सार्थक होईल, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, एके दिवशी पद्मावती भगवान बालाजीस म्हणाली आपण भूलोकावर दूत पाठवा, म्हणजे लिलावताराची माहिती सामान्यजणांना कळेल. म्हणून बालाजींची माहिती देण्यासाठी नंदन पाठवला, त्याची कथा अशी आहे. आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात एक स्त्री पुत्रप्राप्तीसाठी तिरुपतीला आली. पुढे तिला एक अण्णम्मा नावाचा पुत्र झाला. त्याच्या मामाच्या दोन मुली होत्या, त्यांच्याशी अण्णम्माचे प्रेम झाले.
अण्णम्मा प्रपंचात रमावा म्हणून आई त्याला शेतात पाठवू लागली. तर तेथे त्याला ‘गोविंदा गोविंदा’चा नाद ऐकू येत होता. त्याला बालाजीने यतीराजच्या रूपात शंखचक्र गदाधारी ईश्वराचा साक्षात्कार घडवला. पुढे आईच्या आग्रहास्तव त्याने त्या दोघी बहिणीशी लग्न केले. मात्र तो तिरुपतीलाच राहून त्यांनी तेलगू भाषेत बालाजींची भजने लिहिली. शेष पर्वतावर वादळ आल्याने तो बेशुद्ध झाला, तेव्हा माता पद्मावतीने वृद्धेच्या रूपात कापूर-भाताचा प्रसाद दिला. पुढे त्याची ओळख अण्णम्माचार्य म्हणून अजरामर झाली, असे युगलशरण यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन ब्रजमोहन राठी यांनी केले.