युद्धाचा फटका; केळी निर्यात ठप्प!

कापणीला आलेली केळी विकायची कुठे ?

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
पथ्रोट, 
impact-of-war-banana-exports-halted : सद्यस्थितीत बाजारपेठेत केळीला चांगली मागणी आहे. परंतु, अमेरिका-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची धग ही केळी बागांपर्यंत पोहोचली असून इतरही धान्याच्या किमतीवर व कांदा यावर सुद्धा फरक पडला आहे. केळीची निर्यात सुद्धा ठप्प पडली आहे. कापणीला आलेली केळी विकायची कुठे ? असा मोठा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्यामुळे परिसरातील बागायतदार अडचणीत आला आहे .
 
 
k
 
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय, विशेषतः शेतकऱ्यांच्या निर्यातीवर मोठा फटका बसला असून, द्राक्षे, केळी आणि कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. युद्धामुळे आखाती देशातील वाहतूक ठप्प झाल्याने जेएनपीटी बंदरावर शेकडो कंटेनर अडकून पडले असून, माल खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे सागरी वाहतुकीत अनिश्चितता निर्माण झाल्याने शिपींग कंपन्यांनी सुद्धा आखातात माल नेण्यास नकार दिला आहे सध्या देशांतर्गत केळीला भाव१७०० ते २००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने स्थानिक बाजारपेठावर दबाव येत असून सद्यस्थितीत सदरचे भाव अर्ध्यावर येवुन ठेपले आहे.
 
 
अशा स्थितीमध्ये जर युद्ध अधिक काळ राहिले तर निर्यातीचा माल देशांतर्गत बाजारपेठेत येईल त्यामुळे पुन्हा केळीच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण होऊ शकते सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना चालू आहे त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये केळीला प्रचंड मागणी असते काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी करार करून बागा निर्यातीसाठी राखीव ठेवल्या होत्या. काहींनी आगाऊ रक्कमही स्वीकारली होती. मात्र युद्धजन्य परिस्थिती तीव्र झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी माल उचलण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
 
 
शेतकऱ्यांचा माल अर्धवट विकला गेला आहे, तर उर्वरित केळी बागेतच पडून आहे. काहींचां माल काढणीच्या उंबरठ्यावर असून वेळेत तोडणी न झाल्यास गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारात मालाचा ओघ वाढून दर घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्च, मजुरी, पॅकिंग, वाहतूक आणि कर्जहप्ते यांचा ताण आधीच वाढलेला असताना या घडामोडींनी शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे.अकोट अंजनगाव पथ्रोट भागातील
केळी उत्पादक शेतकरी या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत आणि सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अडकलेल्या मालाबाबत मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केळी उत्पादकाकडून सुरू आहे.
 
 
रमजान महिना सुरू असल्याने देशांतर्गत मार्केटमध्ये केळीला मागणी कायम आहे. तसेच नवीन टरबूज अजून पूर्ण क्षमतेने बाजारपेठेत दाखल झालेले नसल्याने केळीची मागणी कायम आहे. मात्र युद्धामुळे पुढील आठवड्यापर्यंत हे चित्र अधिक भयावह होण्याची भीती निर्माण झाली आहे.
-सचिन मांगूळकर
संचालक जगदंबा केला सप्लायर्स, पथ्रोट
 
 
परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांची केळीची बाग काढणीला तयार आहे. माल नेण्यासाठी व्यापाऱ्यांशी बोलणीही केली . परंतु अचानक थांबण्याचा निर्णय दिला. निर्यात नेमकी किती दिवस बंद राहील याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
-नितेश दुबे (महाराज)
केळी उत्पादक शेतकरी