गोंदिया,
vinod-agarwal : गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्यांना धानाचे चुकारे वेळेवर मिळावेत, यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही शेतकर्यांच्या थकीत देयकांच्या भुगतानाची मागणी केली होती. या प्रयत्नांचे फलित म्हणून राज्य सरकारने शेतकर्यांच्या थकीत देयकांच्या भुगतानासाठी २०८ कोटी ८८ लाखांची निधी मंजूर केली असून या निधीमधून सुमारे २५ लाख १५ हजार क्विंटल धानाचे चुकारे लवकरच शेतकर्यांना अदा करण्यात येणार आहेत.

३१ जानेवारीपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकर्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच सुमारे ५० हजार क्विंटल धानाचे चुकारे अद्याप प्रलंबित आहेत, त देखील ३१ मार्चपर्यंत शेतकर्यांना मिळावेत यासाठी आ. अग्रवाल प्रयत्नशील आहेत. याशिवाय शेतकर्यांना दिलासा मिळावा यासाठी धान खरेदीची मर्यादा (लिमिट) वाढविण्याची मागणीही ते सातत्याने करत आहेत. शेतकर्यांच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे शेतकर्यांमध्ये लवकरच सर्व थकीत देयके मिळतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. शेतकर्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आ. अग्रवाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून प्रलंबित मागण्याही लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.