मराठी शाळा वाचविण्यासाठी ‘एल्गार मोर्चा’

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
marathi-schools : राज्य सरकारने पटसंख्येच्या कारणावरून हजारो मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे. त्या अनुषंगाने मंगळवार, 17 मार्च रोजी श्रमशक्ती भवन येथून प्रचंड एल्गार मोर्चा राज्याध्यक्ष वैभव चोपकर, राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, जिल्हाध्यक्ष अथर्व निवडिंग, शहराध्यक्ष अयान शाह यांच्या नेतृत्वात प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
 
 
k l
 
 
 
यावेळी दिलेल्या निवेदनात राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरविणारे धोरण रद्द करण्यात यावे, दत्तक शाळा योजनेंतर्गत शाळांचे खाजगीकरण करण्याची तयारी सुरू असून दत्तक शाळा योजना रद्द करून शासनानेच शाळांची जबाबदारी घ्यावी, या प्रमुख मागण्या आहेत.
 
 
या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देण्यात आले. यावेली केरळ राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्यात यावे, हीसुद्धा मागणी करण्यात आलेल्या या लक्षवेधी मोर्चात बहुसंख्येने पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
 
 
याप्रसंगी भाकपचे जिल्हा सचिव अनिल घाटे, आयटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, दिवाकर नागपुरे, अखिल भारतीय नौजवान सभेचे राज्याध्यक्ष सागर दुर्योधन यांनी या मोर्चाला भरीव पाठींबा दिला.
 
 
यासाठी अभिजित नगराळे, रोशनी कांबळे, पीयूष सोनुले, अनुष्का आत्राम, भुवनेश्वरी चामाटे, प्रेम ठेंगणे, कृष्णा यनगंदेवार, भूषण गणवीर, संगीता गाडेकर, गुलाब उमरतकर, ईश्वर दरवरे, विठ्ठल मडावी यांनी पुढाकार घेतला.