पाणीटंचाईची चाहूल; एप्रिल-मे अधिक कठीण

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
मुंबई,
water-shortage : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे. १५ मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील साठा निम्म्यापेक्षा खाली आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर ताण वाढला आहे.
 
 
 
mumbai-water-shortage
 
 
गेल्या काही दिवसांत तापमान ३५ अंशांच्या वर गेल्याने धरणांतील पाणी वेगाने कमी होत आहे. त्याचवेळी, उन्हाळ्यामुळे नागरिकांचा पाण्याचा वापरही वाढला आहे. यंदाचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे.
 
भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या धरणांमधील साठा घटत चालला असून, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
महापालिकेने अद्याप पाणी कपातीची घोषणा केली नसली तरी नागरिकांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाण्याचा वापर टाळणे, गळती तात्काळ दुरुस्त करणे आणि शिळ्या पाण्याचा पुनर्वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.