मुंबई,
stormy-weather : राज्यात उन्हाळ्याच्या काळातच हवामानाने अचानक बदल घेतला असून उष्णतेनंतर आता वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने १८ ते २० मार्चदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भात नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव येथेही वादळी पावसाची शक्यता असून इतर काही जिल्ह्यांत हलक्या सरी पडू शकतात.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर या भागांमध्ये हवामान ढगाळ राहून हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्ण आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असली तरी काही ठिकाणी वादळाची शक्यता नाकारता येत नाही.
कोकण किनारपट्टीवरही पुढील काही दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतीला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनीही आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.