नवी दिल्ली,
Government issues strict orders to airlines विमान प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारे नवे नियम जाहीर केले आहेत. भारत सरकारच्या निर्देशांनुसार आता विमान कंपन्यांना मनमानी पद्धतीने आसन निवडीसाठी अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. प्रत्येक उड्डाणातील किमान साठ टक्के जागा प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एकाच आरक्षणावर प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना शक्य तितके एकत्र बसण्याची सोय करणे विमान कंपन्यांची जबाबदारी असेल. शेजारील जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक ठरणार आहे.याशिवाय, क्रीडा साहित्य, वाद्ये तसेच पाळीव प्राणी वाहतुकीसंदर्भात स्पष्ट आणि पारदर्शक धोरण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांना या सर्व नियमांची माहिती आधीपासूनच समजावी यासाठी कंपन्यांनी ती स्पष्टपणे जाहीर करणे गरजेचे आहे.
उड्डाणात विलंब, रद्द होणे किंवा प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारल्यास त्यांच्या हक्कांचे काटेकोर पालन करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व हक्कांची माहिती तिकीट आरक्षणाच्या प्रत्येक माध्यमावर तसेच विमानतळांवरही स्पष्टपणे दाखवावी लागणार आहे.नव्या नियमांनुसार प्रवाशांना त्यांच्या हक्कांची माहिती प्रादेशिक भाषांमध्ये देण्यावरही भर देण्यात आला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना हे नियम सहजपणे समजतील आणि त्यांचा लाभ घेता येईल.