मुंबई,
Thackeray group will suffer a setback महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने विरोधी पक्षातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विश्वसनीय सूत्रा च्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांपैकी अनेक जण सत्ताधारी गटाकडे वळण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत संभाव्य पक्षांतराच्या हालचालींबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही या संदर्भात विचारविनिमय झाल्याची माहिती पुढे आली आहे.या संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय चर्चा नाही, तर आवश्यक प्रक्रियेबाबतही दिल्लीमध्ये सविस्तर विचार करण्यात आल्याचे समजते. या दौऱ्यात मंत्री उदय सामंत हेही सहभागी होते. संबंधित खासदार योग्य वेळ साधून सत्ताधारी गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. या साऱ्या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा जोर धरत आहे. आगामी काळात या घडामोडींचा वेग वाढण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष पुढील राजकीय निर्णयांकडे लागले आहे.