राज्यात अवकाळी पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

    दिनांक :19-Mar-2026
Total Views |
मुंबई,
unseasonal rain राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल झाला असून अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आला असून पुढील काही तास हवामान अत्यंत धोकादायक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

unseasonal rain Maharashtra, orange alert Maharashtra weather 
नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता वाढू शकते.
दरम्यान, काल राज्यातील unseasonal rain अनेक भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, बाजरी यांसह फळबागायती आणि भाजीपाला पिकांवर या पावसाचा गंभीर परिणाम झाला आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे थंडी वाढली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरही गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. सांगोला तालुक्यातील जुनोनी परिसरात सुमारे दीड तास गारांचा पाऊस सुरू होता, ज्यामुळे डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर परिसरातही सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, गहू, ज्वारी तसेच आंबा यांसारख्या फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी कठीण बनली आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून काही भागांत पुन्हा पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.