प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर
चंद्रपूर,
Iran khdi War इराण आणि खाडी देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आणि अबुधाबी या शहरांत शिक्षणासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील काही विद्यार्थी अडकून पडले आहेत. शनिवारपासून काही भागांत क्षेपणास्त्रांचे, सायरनचे आवाज आणि स्फोटांचे धक्के जाणवत असल्याचे सांगत, या विद्यार्थ्यांनी भारत सरकारला मदतीचे आवाहन केले आहे.
इराण व खाडी देशांतील तणावाने स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा परिणाम तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांवरही होत आहे. दुबईत शिकत असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रय संजय तायडे, श्रावणी धाबेकर, मोहन काले तसेच स्वप्निल खरतड, मयूरी खरतड, इवान खरतड (2 वर्ष) आदी नागरिक तिकडे अडकले आहे.
Iran khdi War चंद्रपूर जिल्ह्यातील कुटुंबीयांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजाह, फुजैराह आदी विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, मायदेशी परतीसाठी प्रवाश्यांची विमानतळांवर गर्दी उसळली आहे. खाडी देशांत अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हाधिकारी विनय गौडा प्रयत्नशील असून, परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला जात आहे.
क्षेपणास्त्रांच्या आवाजाने भिती वाटते
दुबईतील जमिलकोट परिसरातील एका विद्यार्थीनीने सांगितले की, क्षेपणास्त्रांच्या आवाजाने आम्हाला भिती वाटत आहे. युध्दांची तीव्रता वाढत आहे. विमानसेवाही बंद आहे. अशा स्थितीत आम्हाला भारत सरकारने मदत करावी आणि येथून सुखरूप काढावे.