कोल्हापूर
Israel war आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक दुबई,इराण, इराक,इजराईल देशांत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत परिस्थितीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोजगार आणि व्यवसायानिमित्त अनेक कोल्हापूरकर आखाती देशांत वास्तव्यास आहेत. सध्या त्या भागात निर्माण झालेल्या तणावामुळे विमानसेवा, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून संबंधित नागरिकांची नावे, संपर्क क्रमांक, वास्तव्याचे ठिकाण आणि सध्याची परिस्थिती याची माहिती गोळा केली जात आहे. तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक त्या मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना कोणतीही अफवा न पसरवण्याचे आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.