नंदुरबार,
Hatbaripada drinking water shortage महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्हा अंतर्गत तळोदा तालुका येथील ऐतिहासिक रावलापाणी शहीद स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील हातबारीपाडा येथे भीषण पाणीटंचाईचे चित्र समोर आले आहे. सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या या पाड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
दरवर्षी २ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त हजारो नागरिक रावलापाणी शहीद स्थळाला अभिवादन करण्यासाठी भेट देतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक येथे दाखल झाले होते. मात्र, ज्या मार्गाने हे नागरिक जातात त्या मार्गावरील हातबारीपाड्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी निझरा नदीच्या पात्रात झिरा करून पाणी काढावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. नदीपात्रातील पाणीही अत्यंत मर्यादित असून ते मिळवण्यासाठी महिलांना आणि लहान मुलांना मोठी कसरत करावी लागत आहे.गावात Hatbaripada drinking water shortage कोणतीही सक्षम पाणीपुरवठा योजना उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. येथील एकमेव हातपंपही गेल्या काही दिवसांपासून निकामी झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर युवा क्रांती नंदुरबार संघटनेने प्रत्यक्ष स्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. ऐतिहासिक स्थळाकडे जाणाऱ्या या मार्गावरील पाड्यांमध्ये तातडीने बोरवेल उभारावी किंवा कायमस्वरूपी जलवाहिनी योजना सुरू करावी, अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, मागण्या तत्काळ मान्य करून पाणीप्रश्न सोडवला नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती पावले उचलते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.