20 वर्षांनंतर लोहीत रंगली रामलीला

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
त्रेतायुगाचा सजीव अनुभव
बालपणीच्या आठवणींना उजाळा, आस्थेची उसळली गर्दी

दारव्हा, 
तालुक्यातील लोही गावात तब्बल 20 वर्षांनंतर पारंपरिक Ramlila रामलीलेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यामुळे गावातील नागरिकांच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही रंगमंचावर सादर होणाèया रामलीलेचे आकर्षण आजही तितकेच कायम असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट होत असून, नागरिकांची मोठी गर्दी दररोज पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला हा रामलीला सोहळा आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. दररोज रात्री गावात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होत असून, रामायणातील विविध प्रसंगांचे सजीव सादरीकरण पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने उपस्थित राहत आहेत.
 
 
Ram lila
 
पूर्वीच्या काळात मोबाईल, इंटरनेट किंवा दूरदर्शन यांसारखी साधने उपलब्ध नसताना रामलीला हेच गावकèयांच्या मनोरंजन आणि एकत्र येण्याचे प्रमुख माध्यम होते. त्यामुळे अशा कार्यक्रमांना मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त होत असे. आता 20 वर्षांनंतर पुन्हा रामलीला सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला आहे. या रामलीलेत सर्व कलाकार उत्तरप्रदेश येथून आले असून ‘संत सनातन धर्म श्री रामायण प्रचारक मंडळ, विंध्याचल धाम, काशी’ यांच्या वतीने या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जात आहे.
 
 
Ramlila  पंडित शिवप्रकाश तिवारी यांच्या मार्गदर्शनात आणि पंडित संतोष तिवारी यांच्या नेतृत्वात कलाकार प्रभावी अभिनय, दमदार संवाद आणि भक्तिमय संगीताच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग जिवंत करत आहेत. आजच्या नव्या पिढीला प्रत्यक्ष रंगमंचावर रामलीला पाहण्याची संधी मिळत असून, रामायणातून मिळणारे आदर्श, संस्कार आणि जीवनमूल्ये भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. लोहीतील ही रामलीला केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून आस्था, परंपरा आणि भावनांचा अद्भुत संगम ठरत आहे. रंगमंचावर सादर होणारे प्रत्येक दृश्य इतके सजीव भासते की प्रेक्षकांना जणू त्रेतायुगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. विशेषतः सीताहरण, लंकादहन आणि रावण वध यांसारख्या प्रसंगांदरम्यान वातावरण पूर्णतः भक्तिमय आणि भावुक बनते.

रामलीलेतील प्रमुख प्रसंग
या Ramlila  रामलीलेत श्रीराम जन्म, विश्वामित्र आगमन, ताडका वध, सुबाहू-मारीच वध, राजा जनकाची प्रतिज्ञा, धनुष्ययज्ञ, परशुराम-लक्ष्मण संवाद, सीताराम विवाह, राम वनवास, शूर्पणखा प्रसंग, खर-दूषण वध, सीताहरण, राम-शबरी भेट, राम-सुग्रीव मैत्री, वाली वध, लंकादहन, लक्ष्मणशक्ती, कुंभकर्ण वध, मेघनाथ वध, रावण वध आणि राम राज्याभिषेक अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केले जात आहे.