मुंबई
Maharashtra Majha ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या नव्या मराठी नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी माणसाच्या अस्मिता, इतिहास आणि भावनांना स्पर्श करणारा विषय प्रभावीपणे मांडल्यामुळे प्रेक्षकांकडून या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या नाटकात त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान जिवंत केला आहे. इतिहासातील निर्णायक क्षण रंगमंचावर अनुभवताना प्रेक्षक भारावून जातात.नाटकातून एकीकडे पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान जागवला जातो, तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या कथा हृदयाला भिडतात. याचबरोबर, आजच्या काळातील वास्तव परिस्थितीवरही भाष्य करत, मुंबईत मराठी माणसाचे स्थान काय उरले आहे, हा प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला आहे.
गिरगाव, लालबाग, परळ आणि दादर यांसारख्या पारंपरिक मराठी भागांमध्ये मराठी माणसांची घटती संख्या अधोरेखित करत “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम संदेश नाटकातून देण्यात आला आहे.