नवी दिल्ली,
pm-modi-meeting-with-cm : मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत युद्धस्थितीचा भारतावर होणारा परिणाम, नागरिकांची सुरक्षितता, तसेच आवश्यक वस्तूंचा पुरवठा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधानांनी ‘टीम इंडिया’च्या भावनेने सर्व राज्यांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. कोविड काळात जसा समन्वय साधून देशाने परिस्थितीवर मात केली, तसाच समन्वय पुन्हा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यांना सज्ज राहण्याच्या आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीत आरोग्य सेवा, आपत्कालीन व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चर्चा झाली. केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम केल्यास कोणतीही परिस्थिती समर्थपणे हाताळता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.