मुंबई
Tukaram Munde राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत विधानसभेत रंगलेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे गैरप्रकारांवर आळा बसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत काही आमदारांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे शासकीय नोकऱ्या व विविध योजनांचा गैरफायदा घेतल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अशा प्रकरणांची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जात आहे. दिव्यांग कल्याण विभागाने तयार केलेली प्रणाली अधिक पारदर्शक असून प्रत्येक प्रमाणपत्राची काटेकोर पडताळणी केली जाणार आहे, असेही फडणविसांनी नमूद केले.तुकाराम मुंढे यांनी देखील या संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे विधान सोशल मीडियावर शेअर करत बोगस किंवा चुकीच्या दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे शासकीय लाभ घेणे हा गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकरणांची पडताळणी करून संबंधितांवर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडे दिव्यांग कल्याण Tukaram Munde विभागाने बोगस प्रमाणपत्रांविरोधात मोठी मोहीम उभारली असून, अनेक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासून काहींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या संस्थांवरही विभागाने कारवाई केली आहे.राज्यातील दिव्यांगांसाठी नव्या डिजिटल सुविधाही विकसित करण्यात आल्या आहेत. ‘दिव्यांग सहाय्यक’ पोर्टल आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या सेवा मिळणार असून, आधार आणि युडीआयडी जोडणीमुळे थेट लाभ हस्तांतरण सुलभ होणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट आणि व्हॉइस नोट्ससारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.राज्यातील वाढत्या बोगस प्रमाणपत्रांच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर भूमिका घेतली असून, खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचाव्यात यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.