आर्वी नाका परिसरात विशाल हिंदू संमेलन
वर्धा,
Hindu Sammelan एक काळ असा होता की भारत हा जगाचा व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्रबिंदू होता. आपण केवळ मसाले किंवा कापड निर्यात करत नव्हतो, तर आपण जीवन जगण्याची पद्धती, आयुर्वेद, योग आणि संस्कारही जगाला दिले आहेत. आज आपण ‘स्व’ ची ओळख विसरून पाश्चात्य अनुकरण करण्यात धन्यता मानत आहोत. जगाच्या एकूण व्यापारापैकी मोठा वाटा भारताचा होता. रोमपासून चीनपर्यंत भारतीय मालाची मागणी होती. जग भारताकडून ज्ञान, विज्ञान आणि संस्कार इम्पोर्ट करत असे. दुर्दैवाने, आज आपण आपली मूळ ओळख विसरून त्यांच्या टाकाऊ गोष्टींचे इम्पोर्ट करत आहोत, असे मार्गदर्शन रा. स्व. संघाचे अमरावती विभाग कार्यवाह दत्तात्रय रत्नपारखी यांनी केले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने स्थानिक आर्वी नाका परिसरातील संत ज्ञानेश्वर मंदिर येथे शनिवारी आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते प्रमुख वता म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर मंदिरचे अध्यक्ष बाबाराव लांडगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भागवत कथाकार मयुर महाराज दरणे उपस्थित होते. रत्नपारखी पुढे म्हणाले की, भारतीय आहारशास्त्र ऋतुमानानुसार आणि शरीराच्या प्रकृतीनुसार ठरलेले आहे. आपली साधी खिचडी किंवा भाकरी-भाजी हे पूर्णब्रह्म आहे.
Hindu Sammelan आज आपण आपल्या पोषक आहाराऐवजी पिझ्झा, बर्गर किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या मागे धावत आहोत. त्यामुळे आजार वाढत आहेत. आपल्या संस्कृतीला सुयोग्य असा आहार आपल्याच ताटातून गायब होत चालला आहे. आपण आपले सण केवळ समाजमाध्यमांवर फोटो टाकण्यापुरते मर्यादित केले आहेत. सणांचा मूळ उद्देश एकत्रीकरण आणि संस्कारांची देवाणघेवाण हा होता. तो कुठेतरी हरवला आहे. घरात पुन्हा एकदा पारंपरिक आणि देशी अन्नाला प्राधान्य द्या, केवळ वस्तूच नव्हे तर विचारही स्वदेशी करा. ज्या देशाला आपला इतिहास आणि संस्कृती आठवत नाही, तो देश आपले भविष्य घडवू शकत नाही, असे दत्तात्रय रत्नपारखी म्हणाले.
मयूर महाराज दरणे म्हणाले की, माणसाने जीवनामध्ये अध्यात्माशी कुठेतरी एकरूप असायला पाहिजे. अध्यात्म संत देतात, संत विचार देतात. साधू, महापुरानंतर अनेक दाखले आपल्याला हे अध्यात्म शिकवतात. अध्यात्म हे आपण जीवनामध्ये स्वीकारत असताना अनेक लोकांच्या समोर एक प्रश्न पडतो की अध्यात्म म्हणजे काय पोथी वाचनेे, खूप पूजा करणे म्हणजे अध्यात्म नाही. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, असे मयुर महाराज म्हणाले. यशस्वीतेकरिता निलेश किटे, उज्वला पेठे, संजय पेठे, किशोर ठाकरे, अविनाश ठाकरे, संजय सहारे, संजय अष्टनकर, आनंद आवथले, विकास झाडे, सारंग परिमल, उद्धव भुसारी आदींनी परिश्रम घेतले.