जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे लोकार्पण ५ मार्च रोजी

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
रवि चोपडे

मुंबई
Jayant Mainkar, परखड, अभ्यासू आणि थेट भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या पहिल्याच लेखसंग्रहाचे लोकार्पण गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे होणार आहे. साहित्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, पुस्तकप्रेमी आणि पत्रकारितेतील जाणकारांसाठी हा विशेष सोहळा ठरणार आहे.
 

Jayant Mainkar, Kataksh book launch 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे तसेच माजी न्यायमूर्ती साधना जाधव उपस्थित राहणार आहेत. ‘कटाक्ष’ या पुस्तकात गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या निवडक राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवरील लेखांचा समावेश आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध, लोकशाही संस्थांपुढील आव्हाने, ग्रामीण-शहरी प्रश्न, तसेच माध्यमांची भूमिका या विविध अंगांनी लेखकाने मांडलेले विचार या संग्रहात वाचकांसमोर येणार आहेत.
जयंत माईणकर Jayant Mainkar,  यांनी चार दशकांच्या पत्रकारितेत टोकदार आणि अभ्यासपूर्ण लेखनशैली जपली आहे. मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ‘कटाक्ष’ या शीर्षकाला साजेशी स्पष्ट, थेट आणि निडर मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
 
 
या पुस्तकाचे प्रकाशन ‘सदामंगल प्रकाशन’तर्फे करण्यात येत आहे. सुबक मांडणी आणि दर्जेदार निर्मितीमुळे हे पुस्तक वाचकांच्या संग्रहात मानाचे स्थान मिळवेल, अशी अपेक्षा प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केली जात आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचे मनोगत, लेखकाची प्रतिक्रिया आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. साहित्यप्रेमी, पत्रकार, विद्यार्थी आणि सार्वजनिक जीवनात रस असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंत माईणकर यांनी केले आहे.