नागपूर,
Ranjit Meshram death, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक, विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम यांचे मंगळवारी (दि. ४ मार्च २०२६) सकाळी ८ वाजता निधन झाले. ते काही दिवसांपासून अस्वस्थ होते. शहरातील दत्ता मेघे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत तसेच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रा. मेश्राम यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांतून त्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची सातत्याने मांडणी केली. ग्रामीण व शहरी भागात जाऊन त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. पत्रकारितेतूनही त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती.त्यांच्या पार्थिवाचे दर्शनासाठी इंदोरा येथील बुद्ध विहार परिसरातील त्यांच्या राहत्या घरी दि. ६ मार्च रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध सामाजिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्ते अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.प्रा. रणजीत मेश्राम यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू, निष्ठावंत आणि तळमळीचा आवाज हरपला आहे. त्यांच्या कार्याची परंपरा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.