इराणवरील हल्ल्यासाठी भारताच्या तळांचा वापर?

अमेरिकन दाव्यावर भारताचा ठाम नकार

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India rejects American claim मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इराणमधील अनेक महत्त्वाच्या शहरांवर जोरदार हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या संघर्षामुळे जगात मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या कारवाईनंतर इराणनेही तीव्र प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवरच नव्हे तर काही ठिकाणी अमेरिकन दूतावासांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान, दुबई आणि इतर काही देशांमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना सावध राहण्याचा आणि आवश्यक असल्यास देश सोडण्याचा सल्ला अमेरिकेकडून देण्यात आला आहे.
 
 
India rejects American claim
 
या पार्श्वभूमीवर भारताचा उल्लेख करत एक धक्कादायक दावा समोर आला. अमेरिकेचे माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एका मुलाखतीत असा दावा केला की मध्यपूर्वेत कारवाया करण्यासाठी अमेरिकेला भारतीय बंदरांवर अवलंबून राहावे लागते आणि भविष्यातील हल्ल्यांसाठी भारताकडून मदत मिळू शकते. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आणि अमेरिका भारतीय तळांचा वापर करून इराणवर हल्ला करण्याचा विचार करत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. या दाव्यांवर भारताने तात्काळ प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की असा कोणताही दावा पूर्णपणे चुकीचा आणि आधारहीन आहे. भारत कोणत्याही परदेशी लष्कराला आपली जमीन किंवा बंदरे युद्धासाठी वापरू देत नाही, ही देशाची दीर्घकालीन भूमिका आहे आणि त्याच धोरणाचे आजही काटेकोरपणे पालन केले जात आहे. भारताने सर्व संबंधित देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करत तणाव कमी करण्यावर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला.
 
 
दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील संघर्षाला सहा दिवस पूर्ण झाले असून परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. हिंद महासागरात अमेरिकन आणि इराणी युद्धनौकांची वाढती उपस्थिती भारतासाठीही चिंतेची बाब ठरत आहे. काही युद्धनौका भारतातील विशाखापट्टणम येथे सराव करून नंतर पश्चिमेकडे रवाना झाल्याच्या चर्चाही सुरू आहेत. या संघर्षात आतापर्यंत अनेक इराणी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.