पुणे /मुंबई
Maharashtra transport strike राज्यातील ई-चलन (E-Challan) प्रणाली आणि पोलिसांच्या कथित डिजीटल दरोड्याविरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटी (M-TAC) ने ५ मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमधील वाहतूक पूर्णपणे थांबलेली दिसत आहे.
ठाण्यातील मुलुंड जकात नाका परिसरात आज सकाळपासूनच तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. बस ओनर सेवा संघ आणि इतर संघटनांनी काळे झेंडे घेऊन बस गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या. यामुळे चक्का जाम आंदोलन निर्माण झाले आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलकांनी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. संपूर्ण परिसरात नवघर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.पुण्यातही चालक आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीने जोरदार निदर्शने केली. ई-चलनाच्या माध्यमातून बेकायदेशीर वसुली थांबवावी, या मागणीसाठी दोन तास रिक्षा आणि प्रवासी मालवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
मुंबईतील आझाद मैदानावर Maharashtra transport strike सुमारे ५०० ते १००० वाहतूक व्यावसायिक एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करत आहेत. या आंदोलनात जड ट्रक, स्कूल बस, खाजगी ट्रॅव्हल्स, टेम्पो, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलकांच्या मते, “एकाच चुकीसाठी दिवसातून अनेक वेळा ई-चलन फाडले जाते, तसेच पार्किंगची सुविधा नसतानाही दंड आकारला जातो.”सरकारच्या बैठका निष्फळ ठरल्याचेही वाहतूकदारांनी सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय बैठक निष्फळ ठरल्याने वाहतूकदारांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत अधिकृत जीआर (Government Resolution) निघत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आज याचा ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.सर्वसामान्यांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्कूल बस असोसिएशनसह हा संप सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचा, विशेषतः बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास अडथळ्यात येऊ शकतो. तसेच दूध, भाजीपाला आणि इंधन पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. टॅक्सी आणि रिक्षा कमतरतेमुळे मुंबई-पुण्यातील नोकरदारांना प्रवासासाठी अतिरिक्त कसरत करावी लागणार आहे.