आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
चंद्रपूर,
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये ‘सल्फ्युरिक अॅसिड टँकर लोडिंग’दरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके हे दोन कामगार जखमी झालेत. त्या पृष्ठभूमीवर माजी मंत्री तथा Sudhir Mungantiwar आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत, जखमी कामगारांना किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने घडणार्या कामगार अपघातांबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 25 कामगारांचा अपघाती मृत्यू होतो, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. Sudhir Mungantiwar आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कामगारांच्या अपघातांबाबत अनेकदा कंपनीच्या अधिकार्यांवर कठोर कारवाई होत नाही. अनेक घटनांमध्ये आजपर्यंत कोणालाही शिक्षा झाल्याचे दिसत नाही. न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अशा प्रकरणांना न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विद्यमान कामगार कायद्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. यासाठी आमदारांची एक समिती स्थापन करून या विषयाचा सर्वंकष अभ्यास करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
दालमिया सिमेंटमध्ये जखमी झालेल्या कामगारांची विचारपूस करण्यासाठी कंपनीचे अधिकारी रुग्णालयातही गेले नसल्याची बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या कामगार अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व स्थानिक आमदारांची संयुक्त समिती स्थापन करावी आणि या संदर्भात शासनाने तातडीने बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.
अधिवेशन होताच मंत्री फुंडकर घेणार चंद्रपुरात बैठक
कामगार मंत्री आकाश फुंडकर त्यांच्या उत्तरात म्हणाले, अपघातात अक्षय कन्नाके व स्वाती उईके हे कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. जखमी कामगारांना कंपनीकडून जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याचे आणि अधिवेशनानंतर चंद्रपूरमध्ये संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.