मुंबई ,
Aspirants Season 3 trailer ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित लोकप्रिय हिंदी नाट्य मालिका Aspirants पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या बहुचर्चित मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच Amazon Prime Video ने प्रदर्शित केला असून, कथेला या वेळी एका नव्या टप्प्यावर नेण्यात आले आहे. मुखर्जी नगरमध्ये यूपीएससी परीक्षेच्या तयारीपासून सुरू झालेली ही कथा आता सत्तेच्या उंच पदांवर पोहोचलेल्या पात्रांच्या आयुष्यातील गुंतागुंती दाखवते. जुन्या महत्त्वाकांक्षा, मैत्री आणि आदर्श तत्त्वांची परीक्षा घेताना सध्याच्या जबाबदाऱ्यांशी होणारा संघर्ष या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.
या सीझनचे दिग्दर्शन Deepesh Sumitra Jagdish यांनी केले आहे. मालिकेत Naveen Kasturia, Shivankit Singh Parihar, Abhilash Thapliyal, Sunny Hinduja, Namita Dubey आणि Tengam Celine हे कलाकार त्यांच्या जुन्या भूमिकांमध्ये पुन्हा दिसणार आहेत. याशिवाय Jatin Goswami यांची नव्या सदस्याच्या रूपात टीममध्ये एन्ट्री झाली आहे. ‘एस्पिरेंट्स’चा तिसरा सीझन १३ मार्चपासून भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.नव्या सीझनबद्दल बोलताना नवीन कस्तुरिया म्हणाले की, “‘एस्पिरेंट्स’ ही मालिका माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहिली आहे. कारण प्रेक्षकांनी फक्त अभिलाषला पडद्यावर पाहिलं नाही, तर त्याच्या प्रवासासोबत स्वतःलाही वाढताना अनुभवले आहे.”
ते पुढे म्हणाले, “तिसऱ्या सीझनमध्ये आपण अभिलाषला अशा वळणावर पाहतो, जिथे कागदोपत्री त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं; मात्र प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव खूप गुंतागुंतीचं असतं. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या मनातील खंत आणि ज्यांनी त्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्या लोकांना गमावण्याची भीती यामध्ये तो अडकलेला असतो. जेव्हा सर्व काही दावावर लागलेलं असतं तेव्हा यश कसं वाटतं, हे या भागात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. या वेळी अभिलाषचं पात्र आपल्या भावना आणि कमतरतांबाबत अधिक प्रामाणिकपणे समोर येईल.”या नव्या सीझनमध्ये अभिलाषच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा उलगडताना दिसणार आहे. कागदोपत्री त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असलं, तरी प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव अधिक गुंतागुंतीचं असल्याचं चित्र समोर येते. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या मनातील संघर्ष आणि नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्यामुळे त्याचा प्रवास अधिक आव्हानात्मक बनतो. दुसरीकडे, संदीप भैय्या हे पात्रही बदलत्या परिस्थितीत स्वतःच्या आदर्शांशी आणि निर्णयांशी झुंज देताना दिसते. मैत्री, स्वप्नं आणि यशानंतर येणाऱ्या अडचणी यांचा वास्तववादी संघर्ष या सीझनमध्ये अधिक प्रभावीपणे उलगडताना दिसणार आहे.