कोची,
India's response to Iran's request अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मानवीय आणि राजनैतिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेहरानकडून आलेल्या विशेष विनंतीनंतर भारताने कोचीच्या दक्षिणेकडील बंदरात इराणच्या एका युद्धनौकेला आश्रय दिला असून त्या जहाजावरील १८३ नौसैनिकांना नौदलाच्या सुविधांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन पाणबुडीने इराणच्या एका युद्धनौकेवर टॉर्पेडो हल्ला केल्याने ती बुडाल्याची घटना घडून अवघे दोन दिवस झाले असतानाच भारताचा हा निर्णय समोर आला. या हल्ल्यात इराणच्या ‘आयरिस देना’ या युद्धनौकेचा नाश झाला आणि त्यावरील ८७ नौसैनिकांचा मृत्यू झाला.दरम्यान, ‘आयरिस लावन’ नावाची आणखी एक इराणी युद्धनौका मागील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेडमध्ये सहभागी होण्यासाठी या परिसरात आली होती. या जहाजाला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते भारतात थांबण्याची परवानगी मागण्यात आली होती. भारताने १ मार्च रोजी या विनंतीला मान्यता दिली आणि हे जहाज ४ मार्च रोजी कोची येथे दाखल झाले. जहाजावरील १८३ सदस्यीय कर्मचाऱ्यांना नौदलाच्या तळावर सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
याचदरम्यान श्रीलंकेनेही इराणच्या ‘आयरिस बुशेहर’ या युद्धनौकेला आश्रय दिला आहे. या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याने श्रीलंकेच्या बंदरात प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती. त्या जहाजावरील २०८ नौसैनिकांना सध्या श्रीलंकेच्या नौदल छावणीत ठेवण्यात आले आहे. इराणची युद्धनौका बुडाल्याच्या घटनेनंतर हिंद महासागर परिसरातील देशांमध्ये वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या संघर्षाचा सागरी व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेली भूमिका व्यावहारिक असून दीर्घकालीन राष्ट्रीय हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.