वर्धा,
pankaj-bhoyar : शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत परिसरातील कचरा संकलन करण्यासाठी वाहनांची कमी उपलब्धता असल्यामुळे दैनंदिन कचरा संकलनास अडचणी निर्माण होते. त्यामुळे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या जनसुविधा निधीअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या १५ घंटागाडीचे शहरालगतच्या ग्रामपंचायतींना पालकमंत्र्यांच्याहस्ते १ रोजी जिल्हा परिषद येथे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, माजी सरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.
अलिकडच्या काही वर्षात शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कचरा संकलनाचे काम मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ग्रामपंचायतींकडे कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने उपलब्ध नाही. त्यामुळे नियमित कचरा संकलनात अडचणी निर्माण होत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून यामुळे ग्रामपंचायतींची स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
वर्धा शहरालगतच्या पिपरी मेघे, उमरी मेघे, नालवाडी, बोरगाव मेघे, सालोड हिरापूर, सावंगी मेघे, म्हसाळा, पवनार, साटोडा, सिंदी मेघे, वरुड, घोराड, केळझर, येळाकेळी, नटाळा पुनर्वसन या ग्रामपंचायतींना ई- घंटागाडीचे पालमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला वर्धा शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे सरपंच, माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.