कोलकाता,
BJP's manifesto in Bengal पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत मोठ्या राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आले. पक्षाने याला ‘विश्वासाचा आवाज’ असे नाव दिले असून, या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी व्यापक आराखडा मांडल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात महिलांसाठी दरमहा आर्थिक मदत, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि विविध सामाजिक व आर्थिक सुधारणा यांसारख्या अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

महिलांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, बेरोजगार तरुणांसाठीही समान रकमेची मदत आणि मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करण्याचा दावा करण्यात आला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. यासोबतच घुसखोरी रोखणे, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणे आणि विविध घोटाळ्यांचा सखोल अहवाल प्रसिद्ध करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शेतकरी आणि मच्छिमारांसाठी स्वतंत्र योजना राबवून त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच राज्यात उद्योगवाढ, चहा उद्योगाचे आधुनिकीकरण आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला आहे.सामाजिक क्षेत्रातही अनेक घोषणा करण्यात आल्या असून, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा तयार करणे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून, नवीन वैद्यकीय व शैक्षणिक संस्था उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रस्तावही जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच विविध भाषांना संविधानिक मान्यता देण्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजपने पश्चिम बंगालमध्ये विकास आणि बदलाचा नवा अजेंडा मांडल्याचा दावा केला असून, यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आगामी निवडणुकीत या घोषणांचा कितपत परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.