बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम रखडले
दर्यापूर,
Daryapur, Municipal Council नगरपरिषद निवडणुकीच्या काळात काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत विकासकाम व सुशोभीकरणाबाबत रिपाईचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. या बाबत पलिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
रिपाईचे तालुका अध्यक्ष अनिल गवई यांनी नगरपरिषद मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, जाहीरनाम्यात दिलेल्या शब्दाप्रमाणे शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवून परिसराचे सुशोभीकरण तात्काळ करण्यात यावे. यासोबतच त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधाप्रकाशव्यवस्था, स्वच्छता, बसण्याची सोय आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी. सध्या पुतळा परिसरात स्वच्छतेचा अभाव, अपुरी प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णतः अभाव दिसून येतो. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. विशेषतः संविधान निर्माता असलेल्या महापुरुषाच्या स्मारकाबाबत अशी उदासीनता ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अनिल गवई यांनी सांगितले. याबाबत प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे की, या कालावधीत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. फक्त पुतळ्याचा प्रश्न नाही, तर हा सन्मानाचा प्रश्न आहे, असे सांगितले.
Daryapur, Municipal Council दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका अद्याप समोर आलेली नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ मतांसाठीच होती का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. पालिकेतील सत्ताधारी जाहीरनाम्यातील शब्द पाळणार का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. शहरातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. मुख्याधिकार्यांना निवेदन देतेवेळी विजय वर्दे, विनोद गवई, शुभम कोरे, सूरज चौधरी, कुलदीप वानखडे, राम गवई, विजय कैथवास आदींची उपस्थिती होती.