मुंबई
Maharashtra weather alert राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत असल्याचे चित्र असून भारतीय हवामान विभागाने (IMD) एकीकडे पावसाचा तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले असून गारपिटीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर दमट आणि उष्ण हवामानाचा प्रभाव कायम राहणार असून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला
दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील काळात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पिकाचे नुकसान
अवकाळी पावसाचा Maharashtra weather alert फटका राज्यातील शेतीला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. जालन्यासह अनेक भागांमध्ये रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून गहू पिके भिजल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीमुळे आधीच गहू काढणी केल्याने बाजारात पुरवठा वाढून दरांमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गव्हाचे दर प्रति क्विंटल सुमारे 3 हजार रुपयांवरून घसरून 2500 ते 2700 रुपयांपर्यंत खाली आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.याशिवाय सततच्या पावसामुळे उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी माधव गाडे यांनी वांग्याला अत्यल्प दर मिळत असल्याने एक एकरातील उभे पीक तोडून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. बाजारात वांग्याला केवळ 1 ते 1.5 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, सततच्या अवकाळी पावसाचा फटका केवळ भाजीपाला आणि धान्य पिकांनाच नाही तर आंबा उत्पादनालाही बसला असून फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस हवामानातील ही अस्थिरता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.