नवी दिल्ली,
transactions above 10 thousand on UPI डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महत्त्वपूर्ण उपाययोजना विचाराधीन आहे. यात मोठ्या रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षिततेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या प्रस्तावानुसार दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे डिजिटल व्यवहार तात्काळ पूर्ण न होता त्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत संबंधित ग्राहकाला आपला व्यवहार पुन्हा तपासण्याची आणि आवश्यक असल्यास तो रद्द करण्याची संधी मिळणार आहे, जेणेकरून चुकीच्या किंवा फसवणुकीच्या व्यवहारांपासून संरक्षण मिळू शकेल.
अलीकडच्या काळात डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे अशा प्रकारच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे. फसवणूक करणारे लोक फोन कॉल, संदेश किंवा विविध आमिषांचा वापर करून नागरिकांना गोंधळात टाकतात आणि त्यांच्याकडून पैसे वळवतात. अशा परिस्थितीत व्यवहाराला थोडा विलंब झाल्यास लोकांना विचार करण्यासाठी वेळ मिळतो आणि फसवणूक टाळता येऊ शकते.
नागरिक आणि संस्थांकडून मागवण्यात आल्या प्रतिक्रिया
या प्रस्तावित बदलांमध्ये काही व्यवहार मात्र पूर्वीसारखेच जलदगतीने पूर्ण होतील, जसे की व्यापारी व्यवहार, नियमित स्वयंचलित देयके आणि विश्वासार्ह खात्यांमधील व्यवहार. ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी मोठ्या व्यवहारांमध्ये अतिरिक्त मंजुरीची तरतूदही विचारात घेतली जात आहे. याशिवाय काही मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर तपासणीची शक्यता आणि एका क्लिकमध्ये डिजिटल व्यवहार थांबवण्याची सोय देणारे नवे वैशिष्ट्य देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणा फसवणूक रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, मात्र व्यवहारांच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि संस्थांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत.